स्वकीय भाषा स्वीकारा , आणि स्वतःचे अस्तित्व टिकवा .....

           


            आज वीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनाचा इतिहास सांगणारा अजय देवगन चा " TANAJI - The Unsung Warrior " या  चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला . आनंद तर खूप झाला कारण आपल्या मायभूमीच्‍या रक्षणासाठी लढणाऱ्या आणि स्वराज्याची स्थापना करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या एका वीराचा इतिहास मोठ्या पडद्यावर आणि जगासमोर येणार आहे , पण त्याच बरोबर दुःखही झालं जे की , आनंदाहूनही अधिक होते  आणि मनाला देखील बोचण्यासारखे आहे . ते म्हणजे  आपल्या प्राणाची आहुती देऊन , स्वराज्याचं आणि आपल्या स्वकीयांच रक्षण करणाऱ्या ह्या वीराच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपटाचे नाव हे इंग्रजीमध्ये , काय तर " TANAJI - The Unsung Warrior " अरे संस्कृती आपली , इतिहास आपला , यशाची शौर्यगाथा आपली पण ती , आपल्या लोकांपुढे मांडायची , विदेशी भाषेचा आधार घेऊन? हे कितपत योग्य आहे , आता सांगा तुम्हीच?
         आता ही एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या माय मराठीची . हा चित्रपट प्रदर्शित होताना हिंदीमध्ये भाषेमध्ये होतोय . माझा काही हिंदी भाषेला विरोध आहे किंवा हिंदी भाषिकांना विरोध आहे अशातला भाग नाहीये , पण महाराष्ट्रात मात्र हिंदी भाषेची गरज नाहीये आणि नाही हिंदी ही महाराष्ट्रातल्या लोकांची व्यवहाराची भाषा आहे , तर मग महाराष्ट्रात चित्रपट हिंदीत का? तो चित्रपट हिंदीत प्रदर्शित होण्याच्या ऐवजी मराठीतच व्हावा आणि व्हायला पाहिजेच , कारण आपल्या माय मराठीचा विकास व्हायला हवा , आणि मराठी महाराष्ट्रात टिकायला हवी . पण आज तसे होत नाहीये आज सगळेच हिंदी चित्रपट महाराष्ट्रात देखील हिंदीतच प्रदर्शित होत आहे .
         

आज महाराष्ट्रातील मराठी भाषिक दिवसेंदिवस कमी होत चालले आहे . २०११ साली महाराष्ट्रामध्ये ८ कोटी १० लाख एवढे मराठी भाषिक होते ,  ही संख्या घटून २०१८ मध्ये झालेल्या जनगणनेत जवळपास ७ कोटी २३ लाख वर पोहचलेली आहे . म्हणजेच सात वर्षांमध्ये जवळजवळ एक कोटीने हा आकडा खाली ढासळलेला आहे . तिकडे कर्नाटक , तामिळनाडू , आंध्र प्रदेश , केरळ या राज्यांसाठी त्यांच्या राज्यभाषेवर असणाऱ्या त्यांच्या प्रेमाखातीर बॉलीवूड त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्यासाठी चित्रपट निर्माण करते , पण या ठिकाणी मराठी भाषिकांसाठी मराठी चित्रपट तयार करण्यासाठी बॉलिवूड मात्र तयार होत नाही , असं का? आज सर्वात जास्त बॉलीवुड चित्रपटांचा व्यापार हा महाराष्ट्रात होतोय , अरे भारतात चित्रपटसृष्टीची सुरुवात देखील दादासाहेब फाळके नावाच्या मराठी माणसाने केलेली आहे . तरीदेखील त्यांच्याच राज्यात , त्यांच्याच माणसांचा इतिहास दुसऱ्या भाषेत बघण्याची सक्ती , का?
         हिंदी भाषेमध्ये चित्रपट प्रदर्शित करत आहात , चांगलेच आहे , करा प्रदर्शित , पण कुठे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये , महाराष्ट्रमध्ये नव्हे . महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी मधूनच ते चित्रपट प्रदर्शित व्हायला हवेत . भारताच्या संविधानामध्ये प्रत्येक राज्यासाठी आणि त्या राज्याच्या राज्यभाषेसाठी समान स्थान आणि न्याय व हक्क देण्यात आलेले आहेत ,

तर मग  या बॉलीवूड चित्रपटांमध्ये मराठीला शेवटचे स्थान का? आणि आज म्हणून महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी नागरिकांना अप्रत्यक्ष सक्ती मुळे हिंदी चित्रपट बघावे लागत आहेत .
          आज खरोखरचं आपल्याला तामिळनाडू , आंध्रप्रदेश , कर्नाटक , केरळा या दक्षिण भारतीय राज्यांकडून शिकण्याची गरज भासू लागली आहे . कारण खरं भाषा प्रेम आणि मातृप्रेम कोणाकडे असेल ना तर ह्या दक्षिण भारतीयांकडे आहे .

कारण स्वतःच्या भाषेच्या विकासासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे तिला टिकवण्यासाठी हे लोक खूप प्रयत्न करत आहेत . आणि हे प्रयत्न भारतातील प्रत्येक नागरिकांने आपली भाषा जपण्यासाठी करायला हवेत .
           मी फक्त महाराष्ट्रापुरता बोलतोय अशातला भाग नाहीये तर , भारतामध्ये जेवढी २८ राज्य आहेत , आणि त्या राज्यांत जी भाषा बोलली जाते , त्या भाषेच्या संवर्धनासाठी त्या त्या राज्यातील नागरिकांनी काम केलेच पाहिजे . कारण आपली भाषा टिकली तरच , आपण जगणार आहे आणि टिकणार आहे . " विविधतेतून एकता " अशी ओळख आपली जगात आहे , आणि म्हणूनच जर ही विविधता नष्ट झाली तर भारतही नष्ट व्हायला वेळ लागणार नाही .
           म्हणून स्वतःच्या भाषेसाठी लढायला शिका कारण आज जर आपण लढलो नाही ना! तर उद्या आपल्या भाषेतील पुस्तके आणि आपली भाषा कुठल्यातरी संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल . म्हणून विचार करा आणि आपली भाषा , आपली मराठी जोपासायला सुरुवात करा .....





   ..... वंदे मातरम् ..... जय हिंद ..... जय भारत .....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्यात्मिकता आणि भौतिकता यांच्यातला महत्त्वाचा फरक .....

आरक्षणाने अपूर्ण की , विनाआरक्षणानी परिपूर्ण हे आता जनतेच्या हातात

भारतीय संस्कृती आणि व्यापाराचा विश्वसंचार .....